तो पुण्यामध्ये एका वृत्तपत्रामध्ये उपसंपादक.
ती मुंबईमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेणारी.
दोघेही अनोळखी. एकमेकांचा जरा सुध्दा गंध नाही, की पुसटशी ओळखही नाही.
त्याला वेड होते ते फेसबूकवरुन नवनवीन मित्र-मैत्रिण जोडण्याचे.
तीला आवड होती नवीन पुस्तके, लेख वाचण्याची. नवनवीन लोकांशी ओळख वाढवण्याची.
तो आपला मुक्तछंदी, मनमिळाऊ, कलाकार मनोवृत्तीचा.
ती सुध्दा तशीच मुक्तछंदी, स्वतःचे विश्व निर्माण करु पाहणारी, २१ व्या शतकातील तरुणी.
हा कधी-मधी पुरवण्यांमध्ये लेख लिहायचा आणि फेसबूकवर शेअर करायचा.
ती नियमीतपणे याच्या प्रत्येक लेखाला लाईक करायची.
काही दिवसानंतर याच्या लक्षात आले की, कोणीतरी आपल्या लेखांना नियमित लाईक करत आहे.
एकदा त्याने असेच ऑफलाईन चॅट करण्यास सुरुवात केली. मग तीने सुध्दा रिप्लाय दिला.
याच्या मनात लाडूच फुटले.
तिही याच्याशी छान गप्पा मारू लागली.
२-२ तास चॅटींग चालायची. खूप बोलायचे दोघे. मस्त जमलं होतं दोघांचं ट्यूनिंग.
हळू हळू बोलणं चॅटींग इतकं वाढलं की १० मि. सुध्दा ऑफलाईन राहणं अवघड झाले.
जेवणाकडे लक्ष नाही की, तब्येतीकडे. सारं लक्ष फेसबुककडे.
ती मोबाईलवरुन फेसबूक हाताळायची तर हा ऑफिसमधून वेळ काढून बोलायचा.
ऑफिस संपलं की, दोघांच्या बोलण्याला विराम यायचा.
यावर शक्कल काढून दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले.
मग काय पहिले चँटींग आणि मग सुरु झाल्या मोबाईलवरच्या गप्पा.
पण मोबाईल सुध्दा कुठे पुरतोय त्यांच्या बोलण्याला. मोबाईलचे बील वाढत होते. बॅलन्स धडाधड कमी होत होते. नुसते रिचार्ज आणि मोठमोठी बीलं भरणं यातचं सर्व पैसा खर्च होत होता.
यावर उपाय म्हणून याने एका दूस-या कंपनीचे सिमकार्ड घेतले आणि तेच कार्ड तिला सुध्दा घ्यायला लावले.
यामुळे दोघांना अगदी कमी पैशात तासभर बोलता येत होते.
आता यांच्या बोलण्याला रात्र सुध्दा कमी पडू लागली.
ती घरी असायची आणि हा रुम करुन राहत होता. तीला तिची आई ओरडायची आणि हा मस्त तिच्याशी गप्पा मारायचा.
तीला खूप बोलावंस वाटायचं पण आईच्या रागावण्याने मध्येच तीला बोलणं बंद कराव लागायचं.
एक दिवसं तिने सकाळीच फोन केला. हा मस्त झोपलेला. गडबडीत त्याने फोन उचलला. ती फार वैतागली होती. खूप काही काही बडबडत होती.
हा तीला समजावत होता. काय झालं विचारत होता.
ती काहीच बोलेनाशी झाली. आणि मग ती हळूच रडत रडत म्हणाली... आय लव्ह यू... मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
याची झोप उडाली. याला काही कळेनासे झाले. एकमेकांना यांनी अजून पाहिले नव्हते. तोंडओळख ती सुध्दा फेसबूकवरील प्रोफाईल फोटोची. बस.. एवढेच त्यांनी एकमेकांना पाहिलेले.
हा तीला समजावत होता. आपण २१ व्या शतकातले, असे एकमेकांना न पाहता कसे एकदम लग्नाबाबत ठरवायचे. तु मला पाहिले नाही, की मी तूला. मला सुध्दा तु आवडतेसं पण इतका पुढचा विचार मी केला नाही.
पहिले आपण भेटूयात मग काय तो निर्णय घेऊयात.
आता या निर्णयावर त्यांची गाडी पोहचली.
पुन्हा बोलणे सुरु झाले. पण आता दोघांत ओढ होती ती म्हणजे भेटीची.
अनेक तारखांच्या बदलानंतर एक तारीख ठरली फेब्रूवारीची.
व्हेलेंटाईन डे ला भेटायचे होते पण तेही जमणार नसल्याने मग त्याआधीची भेटं ठरली.
ह्याची भेटण्याची तयारी सुरु झाली आणि तिची सुध्दा.
कसं भेटावं? काय बोलावु? ती कशी असेल? तो कसा दिसत असेल? ती काळी की गोरी? हा उंच की बुटका़?
अशा अनेक प्रश्नांनी दोघांच्या मनात घरं करण्यास सुरुवात केली.
मग यांनी भेटण्याआधीच ठरवल, की भेटल्यावर जर आपण एकमेकांना आवडलो नाही तर तसं स्पष्ट सांगायचं. कोणीच कोणाला चूकीचे ठरवणार नाही. तसेच कोणीच कोणावर रागावणार नाही.
हा मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम यांनीच ठरवला. वेळ ठरली, स्थळ ठरले.
सकाळी ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने हा मुंबईला निघाला. सीएसटीला भेटण्याचे ठरले.
याचे स्वप्न होते की, एकदा तरी मरीन ड्राईव्हला जायचं. तिथे एक संध्याकाळ काढायची.
मग तिथेच भेटायचे ठरले. दोघेही मस्त तयार होऊन सीएसटीवर पोहोचले. तीथल्या गर्दी गोंगाटात एकमेकांना शोधू लागले.
इकडे शोध तिकडे शोध चालू झाला. फोन न करण्याचे ठरवले होते त्यांनी.
आता बोलायचे ते समोरासमोरच.. असंच त्यांनी ठरवलं होतं.

एकमेकांना दोघांनीही पाहिलेलं नव्हत आतापर्यंत.
ओळख फक्त फेसबूकवरच्या त्या प्रोफाईल फोटोंचीच.
इकडे तिकडे शोधत शोधतं ते एकमेकांसमोर येऊन उभे राहिले. दोघेही एकदंम स्तब्ध. कसलाच आवाज नाही की, कसलीच गडबड नाही. जणू त्यांच्यासाठी सीएसटी म्हणजे एका निरवं ठिकाणाासारखं झाले होते.
तीने पटकन येऊन याला मिठी मारली. जगाचे, लोकांचे कसलेच भान आता उरले नव्हते. आसं होती ती फक्त एका भेटीची. त्या एका उबदार मिठीची. तो ही गहीवरुन आला. कसंबसं सावरत दोघे गप्पा मारत मारत मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघाले.
दोघांनी एकमेकांना पहिल्यांदाच पाहिले होते. त्यांची जोडी काही हिरो -हिरॉईन सारखी नव्हती. तो खूप हँण्डसम आणि ती खूप ब्यूटीफूल असं ही काही समिकरण नव्हतं पण दोघांचा स्वभाव तिळमात्र वेगळा नव्हता.
दोघेही आपल्या विश्वात रमणारे, आपली स्वप्न जोपासणारे, आपलं स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करणारे, उंचउंच भरारी मारण्याची स्वप्नं पाहणारे हे दोन पक्र्षी आज पहिल्यांदा एकत्र आले होते.
जणू त्यांना असं वाटतं होतं, की देवाने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे. ते दोघे होते ही तसेच. एकदम वेगळे.
दोघांना जशा आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा होती, तशीच ती दोघं होती. दोघांनाही काडी मात्र रागाची झालंर नव्हती. ते मस्त मजेत इकडे तिकडे फिरत होते. मुंबईच्या त्या आफाट गर्दीच्या व रहदारीच्या रस्त्यावर हातात हात घालून मोकळेपणाने फिरत होते.
एकमेकांचा हात त्यांच्या हातून सुटत नव्हता. याला मुंबईची फार आवड होती त्यामुळे तो भलताच खूष होता. तीला तो भेटला त्यामुळे तिचा आनंद सुध्दा भरभरून आला होता.
जसजशी संध्याकाळ होत होती तशी यांची पाऊले मरीन ड्राईव्हकडे वळू लागली.
मस्त सूर्यास्ताच्या वेळी यांनी मरीनड्राईव्ह गाठली. निवांत एका ठिकाणी त्यांनी एक जागा निवडली.
समुद्राच्या लाटा, सुर्यास्ताचा मंद प्रकाश व दूर वर समुद्राच्या पाठीमागे लपणारा तो सुर्य आणि त्याला न्याहळत एकमेकांचे हात हातात घेऊन बसलेली ही दोन पाखंर.
आता त्यांना कशाचीच चिंता नव्हती, ना जगाची, लोकांची, की घरच्यांची. हा दिवसं संपूच नये असं त्यांना वाटत होतं.
संध्याकाळ हळू हळू संपायला लागली आणि रात्रीचा अंधार सर्वत्र पसरू लागला. समुद्राच्या त्या टोकाला सुर्याने सुध्दा आता विश्राम घेतला. निळसर थोडं तांबडं आभाळ त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसणा-या त्या लाटा घेऊन पायापाशी धडकतं होत्या.
अंधाराची चाहूल लागताचं तिची घरी जायची लगबग सुरु झाली. हा मात्र तिला अजून थोडं थांब म्हणून विनवणी करत होता. तीच मन होत नव्हतं घरी जाण्याचं परंतु आईचा सारखा सारखा फोन येत होता.
जड पाऊलाने दोघांनी एकमेकांचा निरोप घ्यायचं ठरवलं. पुन्हा एकदा घट्ट मिठी मारुन एकमेकांना एका सुंदर आठवणीत अडकवलं.
दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडला.
दोघेही एकमेकांना आवडू लागले.
दोघे ही प्रगल्भ विचारांचे. दोघांमध्ये अडचण होती ती म्हणजे-
दोघांच्या जाती वेगवेगळ्या. त्यातचं हा मुळचा छोट्या शहरातला आणि ती मात्र मुंबईची. आणि तीला मुंबईतच रहायचं होत.ं पण याला मुंबई परवडणारी नव्हती.
त्यातच त्याचे शिक्षण संपून तो नोकरी करत होता.
आणि तिचे शिक्षण अजून बाकी होते.
तरीही दोघांनी ठरवलं, की आपणं एकमेकांवर प्रेम करतो हेच आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
ते दोघे खूप पुढच्या विचारांचे होते.
दोघांनी ठरवंल की, एकमेकांवर जबरदस्ती करायची नाही. तु माझ्याशी लग्न करचं असं कधीच म्हणायचं नाही.
दोघांच्या घरची मान्यता असेल तरच लग्न करुयात. नाही तर एकमेकांपासून आपण दूर होऊ यात.
आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे यातचं आपलं सर्वस्व आहे. एकमेकांवर रागावून संशय घेऊन दूर होण्यापेक्षा एकमेकांच्या सुंदर आठवणी आपण विलग होऊयात असं तिने ठरवलं.
दोघांची स्वप्न एकसारंखी.
दोघांनाही पूर्ण करायची होती त्यांची स्वप्न.
दोघांनाही गाठायची होती त्यांचे ध्येय.
मग दोघांनी आणखीन एक निर्णय घेतला.
जर आपण एकमेकांच्या स्वप्नांच्या आड येऊ लागलो तर आपण स्वप्न पूर्ण करुयात. एकमेकांना सोडण्याची वेळ आली तर ते ही करुयात.
या निर्णयासोबतचं त्यांच्या पहिल्या भेटीचा दिवस संपला. मग पुन्हा दोघे हातात हात घेऊन सीएसटीकडे निघाले.
जसे आले होते तसेच... फक्त यात बदल म्हणजे येताना दोघांच्या चेह-यावर एक वेगळा आनंद होता भेटण्याचा, परंतु आता मात्र दोघांच्या डोळ्यात पाणी होते.. ते म्हणजे विरहाचे. वेगळे होण्याचे....तसेच पुढच्या भेटीच्या आनंदाचे....