Friday, January 24, 2014

आई-मुलींच्या भावनांची 'दंगल'



काल 'दंगल' हा चित्रपट पाहिला. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट खुपच छान आहे. वेळोवेळी चित्रपटात उत्कंठा वाढवणारे दृष्य आहेत. काही दृष्य हृदयाचा ठाव घेतात, काही अंगावर शहारे आणतात तर काही डोळ्यात पाणीही आणतात. एकंदर काय तर फुल्ल टू पैसा वसूल चित्रपट. परंतु या चित्रपटाची एवढीच व्याख्या करणे चुकीचे आहे. मुळात हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या नजरेतून पाहाणेच चुकीचे आहे. या चित्रपटाला अनेक अँगलमधून पाहाता येईल. म्हणजेच वडीलांच्या नजरेतून, एका जिद्दी नवऱ्याच्या बायकोच्या नजरेतून, दोन मुलींच्या आईच्या नजरेतून तसेच आपल्या खेळण्या बागडण्याच्या वयात स्वातंत्र्य हरवून बसलेल्या मुलींच्या नजरेतून हा चित्रपट पाहिल्यास या चित्रपटातील वेगवेगळ्या छटा आपल्याला जाणवायला लागतील. 


एका आईच्या भावनेचा संघर्ष, पुरूषी मानसिकेत वाढणाऱ्या समाजात वावरणाऱ्या वडीलांचा संघर्ष, बालपणातील सोनेरी क्षण हरवून वडीलांच्या हट्टापायी कुस्ती शिकणाऱ्या मुलींचा संघर्ष अशा विविध छटांमधून चित्रपट पाहाताना कोण बरोबर आणि कोण चुकीचे असे ठरवणे अवघड होऊन जाते. 

वडीलांच्या नजरेतून पाहाताना वाटते की, वडील जे करत आहेत ते मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच आहे. त्यांना पुढे समाजात मान उंच करून वावरता येईल. जे करतोय त्यांच्या भल्यासाठीच करतोय, असे कदाचित एखाद्या वडिलांना वाटून जाऊ शकते. 

तर आईच्या नजरेतून पाहाताना वाटते की, नवऱ्याच्या मुलासाठीच्या हट्टापायी चार वेळेस प्रसूतीच्या मरण यातना सोसलेल्या त्या बिचाऱ्या महिलेला स्वतःच्या मुलींच्या भविष्याबद्दल काहीही ठरवता येत नाही. ती उघडपणे आपल्या नवऱ्याला बोलूही शकत नाही. नवऱ्याचा शब्द तो शेवटचा शब्द अशा पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या आईची ती घालमेल, पुरूषी अहंकारात वावरणाऱ्या महिलांना आपलीशी वाटू शकते. 

मुलींच्या नजरेतून पाहाताना असे वाटू शकते की, आपले वडील स्वतःची स्वप्ने बळजबरीने त्यांच्या मुलींकडून पुर्ण करून घेण्यासाठी अत्यंत अमानवी प्रयत्न करत आहेत. त्या मुलींच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना कुस्तीपटूंप्रमाणे अमानवी कसरत करायला लावणे हे कदाचित खटकू शकते. मनात नसताना आपल्याला मुलांप्रमाणे कपडे घालायला लावणे, केस कापणे, शाळेत त्या मुलींची टर उडवणे या गोष्टीही एखाद्या आजच्या मुलीला खटकण्यासारख्या ठरू शकतात. 

केवळ चित्रपट म्हणून या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक ठिकाणी याची चर्चाही सुरू आहे. युजर्स सोशल नेटवर्कींवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलतही आहेत. मात्र त्यांना कोण योग्य आणि कोण अयोग्य असे विचारल्यास तेही थोडे विचारात पडू शकतात. कदाचित तुम्हीही याबद्दल विचार केला असेल. 

ते म्हणतात ना, प्रत्येक इतिहास घडताना न कळत अनेकांचा बळी गेलेला असतो. मात्र त्यांची कुठेच चर्चा होत नाही. चर्चा होते ती फक्त यशाची. ते यश ज्याने मिळवले आहे त्याची. तो व्यक्ती कसा घडला याची. दंगलमध्येही तसेच घडले आहे. महाविर सिंगच्या स्वप्नासाठी त्या चिमुरड्या मुलींच्या बालपणाचा, त्यांच्या इच्छा, अपेक्षांचा, एका आईच्या भावनांचा बळी गेलेला प्रेक्षकांना तसूभरही आठवत नाही. लक्षात राहाते ते केवळ महाविर यांचे गोल्ड मेडल आणि गीताचे यश!



Sunday, January 12, 2014

‘रावण’... एक अद्भूत व्यक्तिमत्व – राहुल रणसुभे

‘रावण’. जितका क्रूर तितका निष्ठावान. जेवढा भयावह, तेवढाच विद्वान, जितका निर्दयी, तितकाच पराक्रमीही. अशा एक नव्हे तर अनेक विसंगती आपल्याला रावणाबाबत सांगता येतील व ऐकायलाही मिळतील.

लहानपणी रामायणातील गोष्टी कानावर यायच्या, त्यात रावणाला अत्यंत क्रूर, विभत्स, निर्दयी असा दानव, राक्षस अशाप्रमाणे सांगितलेलं असायचं. मांडलेला असायचा मांडल जायचं. त्याने सीतेचं अपहरण केलं. तिला फसवून पळवून नेलं.. इ. परंतु त्याचबरोबर रावणाबाबत चांगलं बोलणारे किस्सेही ऐकायला मिळायच्या. जे इतर कोणत्याही राक्षसाबाबत कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. तेव्हा रावणात असं काय होतं, ज्यामुळे एक राक्षस असूनसुध्दा त्याची मंदिर बांधली गेली, त्याची अनेक ठिकाणी लोकं पुजा का करतात, त्याच्याबद्दल एवढं भरभरून का बोललं जातं. अशा अनेक विचारांचा डोक्यामध्ये गोंधळ व्हायचा.

आज जेव्हा चित्रकार उमेश वाघ यांची रावणाची चित्रं पाहिली, तेव्हा या सर्व विचारांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. उमेश यांची चित्र काढण्याची पध्दत, रंग वापरण्याची शैली, व्यक्तिरेखा रेखाटण्याचा अंदाज, लयदार रेषांचा वापर हे सर्व पाहून आपलं मन न कळत त्या पुराणातील कथांमध्ये हळूवारपणे निघून जातं.

ही चित्रं पाहताना थोडी वेगळी वाटली तरी, त्यातील रंगछटा, चेहऱ्याचे हावभाव, रावणाचं व्यक्तिमत्व उमेश यांनी अतिशय उत्तमरितीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. रावणाचा एक व्यक्ती म्हणून, एक राजा म्हणून, एक भाऊ म्हणून तसंच एक विद्वान पंडित म्हणून असलेली प्रतिमा चित्रकाराने आपल्या चित्रातून समर्पकपणे मांडलीये.

आपण रावणाकडे एक अत्यंत वाईट मनुष्य म्हणून जरी पाहिले तरी, त्याच्यातील अंगभूत चांगले गुणही विचारात घ्यावेच लागतात. रावणाने अनेक वर्षे सीतेला आपल्या ताब्यात ठेवूनही तीच्यावर कधीच जबरदस्ती केली नाही, की स्पर्शही केला नाही. त्यामुळे वाईटाचे प्रतिक असलेला काळा रंग आणि शांती व संयमाचे प्रतिक असलेला पांढरा रंग या दोन्ही रंगांचा उत्कृष्ट मिलाप आपल्याला या चित्रांमधून पहायला मिळतो. या दोन्ही रंगांच्या विविध रंगछटांच्या माध्यमातून रेखाटलेली रावणाची प्रतिमा आपले नकळत लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरते.

उमेश यांच्या या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रेखाटलेला हा ‘रावण’ अमूर्त स्वरूपातला असल्याने चित्ररसिकांना एक वेगळा प्रयोग यातून नक्कीच पहायला मिळतो. रावणी दहा तोंडं व त्याच्या दहा भावमुद्रांचा उत्तम संगम उमेश यांनी आपल्या चित्रातून रेखाटला आहे. त्यांच्या अशाच चित्रांचे प्रदर्शन येत्या १५ ते २१ जानेवारी रोजी मुंबईच्या जाहानगिर आर्ट गॅलरीत भरतयं. तुम्हालाही या चित्रांमधील एक वेगळी ‘अनुभूती’ अनुभवायची असेल तर या चित्र प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या.

‘अनुभूती’ - चित्रप्रदर्शन
स्थळ – जाहानगिर आर्ट गॅलरी,
फोर्ट, मुंबई
दिनांक - १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०१४