अभिनय उत्कृष्ट, ग्राफीक्स उत्कृष्ट, वेशभुषा उत्कृष्ट, चित्रिकरण उत्कृष्ट, प्रमोशन उत्कृष्ट, मात्र कथानक... कमी दर्जाचे..
'बाहुबली' हा चित्रपट एकाच भागात संपायला हवा होता आणि जर दोन भाग करायचेच होते तर, पहिल्या भागाच्या शेवटावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अधिक विचार करायला हवा होता. सध्याचा चित्रपट एखाद्या डेलीसोप सिरियल प्रमाणेच भासतो... म्हणजे प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला न्यायची आणि मध्येच To be Continue! असे सांगायचे. त्यासाठी प्रेक्षकांना मग दुसर्या दिवशी अथवा दुसर्या आठवड्यात ती सिरियल पाहायला भाग पाडायचे. मात्र एक दिवस अथवा एक आठवडा भारतीय प्रेक्षकांना अंगवळणी पडलंय. मात्र तब्बल १ वर्ष थांबायचे म्हणजे जरा जास्तच होतं.
हॅरी पॉटर या चित्रपटाचे ८ भाग निघाले. मात्र प्रेक्षक सिनेमागृहातून कधीच असंतुष्ट होऊन बाहेर पडला नाही. त्यांनी प्रत्येक चित्रपटाचा शेवट अगदी योग्य पध्दतीने आखला होता. विशेष म्हणजे एकाच कादंबरीचे आठ भाग असूनसुध्दा कोणताच भाग प्रेक्षकांना अर्धवट वाटत नाही. मात्र बाहूबली हा काल्पनिक कथेवर आधारित चित्रपट असूनही तो प्रेक्षकांना निराश करतो.
मुळात ही निराशाही दिग्दर्शकांनीच केलेली आहे. कारण चित्रपटाचे प्रमोशन, त्यासंदर्भातील बातम्या, भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट, सर्वात मोठा सेट अशा अनेक बाबी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवून दिग्दर्शकांनी या चित्रपटाची प्रचंड उत्सूकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. मात्र ही प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून धरण्यास दिग्दर्शक कुठेतरी कमी पडले आहेत. अथवा त्यांचा अंदाज चुकला आहे. त्यामुळेच अनेकांनी चित्रपटाला केवळ ३.५ स्टार दिले आहे.
एक गोष्ट मात्र खरी आहे, ज्यांनी हिंदीतील 'मुघल-ए-आझम', 'जोधा अकबर', टॉलिवूडचा 'मगधिरा', हॉलिवूडचा 'ट्रॉय', 'ग्लॅडिएटर' आणि '३००' हे चित्रपट पाहिले नाहीत त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. पण त्यांचीसुध्दा या चित्रपटाची पटकथा निराशा करेल. मात्र ज्यांनी हे इतर चित्रपट पाहिले आहेत. त्यांची मात्र घोर निराशाच होईल हे मात्र नक्की!

No comments:
Post a Comment