Wednesday, August 9, 2023

वेळ काढावा लागतो, तो मिळत नाही..

१० ऑगस्ट २०११

आपल्या आयुष्यात आपल्याला खुप काही करायचं असतं, परंतु दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत आणि पैसे कमवण्याच्या नादात अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. विद्यार्थी दशेत असताना आपण अनेक गोष्टी या नोकरी लागल्यावर करुयात असा विचार करतो. आपण खुप काही गोष्टी करायच्या ठरवतो आणि नोकरी लागल्यावर ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्याच विसरुन जातो. पुन्हा मग आपल्या भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमानसुध्दा घालवतो. हे प्रत्येकाचे होत असते. परंतु आपला आज किती महत्वाचा आहे आणि आपण पाहिलेली स्वप्न आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी किती महत्त्वाची आहेत, हे आपल्याला कळतच नाही.

काल मी सलग ३ आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट पाहिला. पुन्हा एकदा एक दर्जेदार आणि अनेक प्रश्नांची उकल करणारा चित्रपट पाहण्याचा हा योग आला. 

चित्रपट आपल्याला काय शिकवतील हे कोणीच सांगू शकत नाही. मला हा चित्रपट पहायचा होता, परंतु नेहमी काही ना काही अडचण येत होती. नंतर नंतर माझ्या सोबत कोणीही हा चित्रपट पाहण्यास तयार नव्हते… कारण सर्वांनीच हा चित्रपट पाहिला होता. अनेकांना विचारल्यानंतर शेवटी मी हा चित्रपट लॅपटॉपवर पाहायचं ठरवल. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच असलेल्या 'डीप सी डायव्हींग'च्या दृष्यानंतरच्या हृतीक रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिल्या आणि लॅपटॉप बंद करुन हा चित्रपट थिएटरवरच पाहायचे ठरवले. शेवटी माझा मित्र (सागर) माझ्यासोबत येण्यास तयार झाला आणि काल रात्रीचा (९ ऑगस्ट २०११) मुहुर्त लागला. त्यानंतर पुन्हा एक अविस्मरणीय अनुभव, आणि आयुष्य जगण्याच्या कलेची एक मोठी शिदोरी मला मिळाली.

आपल्या दैनंदिन जिवनात वेळ मिळत नाही म्हणणारे अनेक लोक मिळतील, परंतु त्यांना हे माहित नाही की, वेळ कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो. वेळेचे नियोजन आणि आपल्या आवडी निवडी या दोन गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. आपण नुसते काम-काम आणि फक्त काम एवढेच करत असतो. मित्र मैत्रीणींचा फोन आल्यावर त्यांना वेळ नाही, खूप काम आहे, जमणार नाही अशी अनेक सबब त्यांच्या समोर मांडत असतो. परंतु असे करत असताना मला 'थ्री इडीयट्स' या चित्रपटातील एका दृष्याचे इथे उदाहरण द्यावेसे वाटते. हे संवाद अगदी अचूक आहेत असे नाही, परंतु तो मला तो सीन महत्वाचा वाटतो म्हणून त्याचं मी इथे उदाहरण देतो…

दृष्य काही असे आहे, 
जिथे त्या कॉलेजमधील एका मुलाचे सबमिशन वेळेवर पुर्ण होत नाही आणि तो मुलगा त्यांच्या प्राचार्यांना व्ही सहस्त्रबुध्दे (बोमन इराणी) यांना विनवणी करतो की, मला अजून थोडा वेळ पाहिजे. मी परिक्षानंतर दोन महिने कॉन्संट्रेशन करु शकलो नाही. तेव्हा बोमन इराणी म्हणतो की, तु दोन महिने जेवण सोडले का, अंघोळ सोडली का.. मग सबमिशनसाठी वेळ कशाला हवाय…
हा संवाद वरवर पाहिला तर अगदी साधा संवाद वाटेल, परंतु नीट विचार केला तर खरंच आपण एवढे बिझी, कामात व्यस्त, वेळ नाही असे काही इतरांना सांगत असतो. पण ते खरंच बरोबर असतं का.. खरंच आपण आपल्या कामासाठी आपल्या जेवणाचा वेळ, झोपण्याचा वेळ, दैनंदीन गरजांचा वेळ हा वापरतो का... नाही ना.. याचा अर्थ असा की आपल्याकडे वेळ असतो.. फक्त आपण तो काढत नाही..

नीट विचार केला तर आपण उगाच दाखवत असलेल्या बिझीपणामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अनमोल क्षण गमावत असतो. हे क्षण कितीही पैसा मोजला तरी ते विकत घेऊ शकत नाही. अथवा वेळ गेल्यानंतर आपण कितीही वेळ या क्षणांकरीता मोजलेत तरी ते क्षण परत येत नाहीत. त्यामुळे वेळीच आपण वेळातून वेळ काढून आपल्याला जे काही करायचे आहे, जे कराव्याशा वाटतात त्या गोष्टी करायला हव्यात. कारण हे जीवन एकदाच मिळते आणि वेळ कोणासाठीच थांबत नसते. त्यामूळे प्रत्येक क्षण जगण्यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे.

जिंदगी ना मिलेगी.... मध्ये सुध्दा अशा अनेक प्रश्नांची उकल होते. आपण जीवनात ज्या गोष्टींना घाबरतो आणि ज्या गोष्टी आपण कधीच केल्या नाहीत, त्या करण्याचा धाडस करणे आणि जीवनातील प्रत्येक क्षण जगणे किती सुखदायी.. आनंद देणारे आहे याची अनेक उदाहरणे या चित्रपटात आहेत. आज हा चित्रपट पाहिल्यानंतर जीवन जगण्याकडे पुन्हा एकदा एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे असे वाटते.

जाता जाता पुन्हा एका चित्रपटातील संवाद मला इथे सांगावासा वाटतो... राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील हा संवाद खुप छोटा आहे परंतु त्या संवादातून जे व्यक्त होते त्यासाठी एक कादंबरी सुध्दा कमी आहे.... तो संवाद काही असा आहे...
''जीन्दगी बडी होनी चाहीये लंबी नही''


जीन्दगी ना मिलेगी दोबारा मधील कवीता...

दिलोमें तुम अपनी बेताबीयॉ लेके चल रहे हो..
तो जीन्दा हो तुम !
नजर मे ख्वाबोंकी बिजलीयॉं लेके चल रहे हो
तो जीन्दा हो तुम !

हवा के झोंको के जैसे आझाद रहना सिखो
तुम एक दरीया के जैसे, लहरों में बहना सिखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हल एक पल एक नया समा देखीये

जो अपनी आखोंमे हैरानिया लेके चल रहे हो
तो जीन्दा हो तुम
दिलोमें तुम अपनी बेताबीयॉ लेके चल रहे हो..
तो जीन्दा हो तुम !



No comments:

Post a Comment