My Dairy (माझी डायरी)
Tuesday, November 4, 2025
I AM A WITCH
Wednesday, January 31, 2024
विपश्यना आणि मी
आज
बरोब्बर १३ वर्ष झाली.
३१ जानेवारी २०११ या दिवशी माझा इगतपूरी येथील
विपश्यनाचा १० दिवसांचा कोर्स पूर्ण झाला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. त्या दिवसानंतर माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं. विपश्यनाला जाण्याचा माझा निर्णय माझ्याआयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता असं मला वाटतं. कारण त्या दिवसांनंतर मी
कोणत्याच भावनेच्या आहारी गेलेलो मला तरी आठवतं नाही. कोणताही विचार, कोणतीही परिस्थिती, कोणतीही समस्या माझ्या मनाचा ताबा घेत
नाही. मी आनंदाने हूरळून जात नाही, नी मनासारखं न झाल्याने दुःखी होत नाही. कोणतीच
घटना माझ्या मनावर आघात करू शकत नाहीये. विपश्येनाला जाण्याआधी मी फार रागीट
होतो. मला कोणतीही घटना आघात करू शकत होती. मी आनंदात हूरळून जायचो आणि टेन्शन आलं
की कोलमडून जायचो. पण आता तसं काहीच माझ्यासोबत घडत नाही.
विपश्यनाला जाण्याचा मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला नको जाऊस असं ही सांगितलं. १० दिवस घरच्यांना सोडून कसं राहशील. १० दिवस मौनव्रत म्हणजे कोणाशीही बोलायचं नाही हे सर्व तुला शक्य आहे का? अशा विविध गोष्टी मला सांगण्यात आल्या. पण माझा निर्णय ठाम होता. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि एकटाच इगतपूरीला गेलो. माझा वाढदिवस २३ जानेवारीला असतो. या वाढदिवसाला आपण स्वतःलाच एक विशेष गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि मी विपश्यनेला गेतो. २१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०११ असा हा कोर्स होता.
ते माझ्या आयुष्यातले १० दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या १० दिवसांत मला माझ्या आयुष्यात घडलेल्या आणि माझ्या मनाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली. सोबतच ज्या गोष्टींनी मझ्या आयुष्यावर गंभीर परिणाम केला असता अशा सर्व गोष्टींतून परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस मला या १० दिवसात मिळालं. मी स्वतःला ओळखू शकलो. माझ्या मनातील भावनांना ओळखू शकलो. या भावना मनात कशा निर्माण होतात हे मला दिसू लागलं. आपण नेहमी भूतकाळातील गोष्टी आणि भविष्याची चिंता यामध्ये गुरफटलेलो असतो. तसं न करता वर्तमानात कसं जगायचं हे मी शिकलो.
विपश्यना ही केवळ एक विद्यानसून ते आपल्या शरीराचं सर्व्हिसींग असल्याप्रमाणे आहे. गाडीला जसं सर्व्हिसींग केल्यावर गाडी नवीन असल्या सारखी भासू लागते. अगदी तसेच विपश्यना केल्यानंतर माणसाला आपला नवीन जन्म झाला आहे असं वाटायला लागतं. प्रत्येक गोष्ट नव्याने समजते. प्रत्येक गोष्ट का घडतेय याचं कारण समजतं. तुम्ही इतरांना दोष देणं बंद करतात. तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला शिकता. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. प्रत्येक क्षणाला तटस्थपणे पाहायला शिकता. इतरांवर प्रेम करायला शिकता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहायला लागतो.
आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी विपश्यना करायला हवी असं मी मानतो. पण कोणाला बळजबरी विपश्यनेला पाठवून त्या व्यक्तीला त्याचा उपयोग होईलच असं नाही. तुम्हाला आतून वाटायला पाहिजे आपण विपश्यना करायला हवी. तेव्हाच या विपश्यनेचा अधिक चांगला उपयोग होतो. हे माझं वैयक्तिक मत आहे.
तुमचा विपश्यनेचा काही अनुभव असेल तर नक्की सांगा मलाही तो जाणून घ्यायला आवडेल.
- राहुल अरुणाकिशन रणसुभे
Wednesday, August 9, 2023
वेळ काढावा लागतो, तो मिळत नाही..
१० ऑगस्ट २०११Saturday, July 25, 2020
दोन रेषा आनंदाच्या
रेश्मा आणि माझ्या लग्नाला ६ वर्षे होऊन गेली. १५ डिसेंबर २०१४ ला आमचे लग्न झालं. आमचं एरेंज्ड मॅरेज. अनेक तरुण तरूणींप्रमाणे आमचीही काही स्वप्न होती. अरेंज मॅरेज असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागतोच. त्यामुळे एक वर्ष त्यासाठीच द्यायचं. मग ठरलं, एक वर्ष फॅमिली प्लॅनिंग करायचं ते. एक वर्ष मस्त मौजमस्तीत गेलं. तेव्हा मी औरंगाबादला एका वृत्तपत्रात काम करत होतो. रेश्माही छोटे मोठे जॉब करत होती. तसं मी लग्न ठरल्या ठरल्या आमच्यासाठी फ्लॅट बुक केला होता. एव्हाना त्याचे हप्तेही सुरू झाले होते. तेव्हा माझा पगार थोडाच होता. तेवढ्यातही घराचे हप्ते फेडून मी रेश्मा आणि आईबाबा असं आमच्या कुटुंबाचं व्यवस्थित चालू होतं. काही कमी जास्त लागलं तर दोन मोठे भाऊ होतेच मदतीला. त्यामुळे काहीच कमी नव्हतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर बीबीसी मराठीत येतंय असं ऐकलं आणि मग त्या ठिकाणी नोकरी लागावी यासाठी प्रयत्न सुरू झाले.
तेव्हा मग मी सांगायचो अजून झालं नाही. तर लगेचच त्या लोकांकडून फुकटचे सल्ले येण्यास सुरूवात व्हायची.
शक्यतो मुंबईमध्ये कोणीही इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. मात्र तुम्ही मुंबई बाहेर पडलात की मग हा प्रश्न एकदम सहज कानावर पडायचा.
तसं मला त्या प्रश्नाचा काही फरक पडत नव्हता. पण जस जसे वर्ष वाढत चालले होते. तेव्हा मात्र मनात कुठेतरी वाटायचं. २०१८ पासून मग माझ्या आईनेच मनावर घेऊन रेश्माला दवाखान्यात दाखवायला सुरू केले. आता रेश्माला दाखवलं तर मी कुठे सुटतोय त्यातून. मग मलाही मनात नसताना त्या दवाखान्यांचे खेटे झिजवावे लागतं. पण मी आईला वेळोवेळी स्पष्ट सांगतचं होतो की, देवाला द्यायचं असेल तर तो देईल नाही तर नाही. उगाच तुही चिंता करू नकोस आणि आम्हालाही चिंता लावू नकोस. तेव्हा ती चिडायची. रडायची. मला कळत होतं तिचं मन.. पण काय करणार या गोष्टी हातात नसतात ना..
पैशाने ही गोष्ट विकत आणता आली असती तर दुसऱ्या मिनिटाला घरात आणली असती. पण हे तसं नाही. या ठिकाणी पैसा-अडका सर्व व्यर्थ ठरतो आणि उरतं फक्त नशीब. आता नशिबात असेल तर ते मिळेल नाही तर नाही, हे माझं मत पुर्वीपासून होतं. कारण मला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही फार फार उशीरा मिळाली आहे. हे तर मला माहितचं होतं. त्यामुळे माझ्या मनात हे नक्की झालं होतं की आपल्याला अपत्यप्राप्ती काही सहजासहजी मिळणार नाही. पण मिळेल अशी खात्री होती.
परंतु एक एक उदाहरण लोकांकडून ऐकायला मिळायचे तेव्हा कधी कधी मन खचून जायचं. रेश्माला डॉक्टरांनी अनेक उपचार करायला सांगितले, काही ट्रीटमेंटही होत्या... पण मी तिला त्या करू देणार नाही हे मी पक्क ठरवलं होतं. कारण माझ्या वंशाला वारस तिचं शरीर खराब करून नको होता. जे काही होईल ते नैसर्गिकपध्दतीनेच अन्यना नाही झालं तरीही चालेल असं माझं मत होतं. पुत्रसुखासाठी लोकं काहीही करू शकतात हे डॉक्टरांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे काही डॉक्टरांनी हा धंदा करून ठेवलाय (काही डॉक्टर चांगलेही आहेत. मी सर्वांना दोष देत नाही.)
"तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत"
आमच्या नात्यामधीलच एका महिलेची दोन वेळा लेप्रोस्कोपी करण्यात आली, मात्र तरीही काहीही उपयोग झाला नाही. मात्र त्या महिलेला गर्भपिशवीचा कॅन्सर झाला. परिणामी तिला अपत्यप्राप्तीशिवाय पिशवीच काढून टाकावी लागली. हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे माझा डॉक्टरांच्या उपचारांवर जास्त भरवसा नव्हता. तरीही आई आणि बायकोच्या हट्टामुळे मला हतबल व्हावंच लागत होतं. पण एक मात्र बरं होतं की, मी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर त्या दोघी माझ्या शब्दाबाहेर नव्हत्या. आईने आर्युवैदिक उपचार सुरू करण्यास सांगितले. तसे आम्ही केलेही. मात्र त्याचा काही फरक जाणवला नाही. तर माझ्या मेव्हणीला पनवेलच्या एका डॉक्टरचा गुण आला होता त्यामुळे तिने आम्हाला त्या डॉक्टरची भेट घेण्यास सांगितले. आम्ही तिथे सर्व टेस्ट रिपोर्ट घेऊन गेलो. रिपोर्ट पाहून ती डॉक्चर म्हणाली की आता खूप उशीर झाला आहे. तुमची ट्रीटमेंट माझ्याकडे होणार नाही. तुम्ही ताबडतोब कुर्ल्यातील या ठिकाणी भेट द्या असं सांगत त्या डॉक्टरने आम्हाला एका IVF सेंटरचा पत्ता दिला. तसंच सांगितलं की, "जर तुम्ही लवकरात लवकर हे उपचार घेतले नाही तर तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत."
पण बायकोला वाटायला नको की मी पैशाकडे पाहातोय.. म्हणून मी होकार दिला. मात्र लगेचच टेस्ट करायची नाही. घरच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचा ठरवलं. त्यानंतर काही दिवसांनी औरंगाबादला गेल्यावर आईला मी हे सांगितलं. माझ्या मावशीच्याच नातीनेही IVF टेस्ट केली मात्र ती फेल झाल्याचं तिनं मला सांगितलं. तेव्हा मग माझं मन पुन्हा विचलीत झालं.
मग तो उपाय आम्ही करायचा सोडून दिला. तेही वर्ष तसंच गेलं.
लग्नाच्या पाच वर्षांनंंतर...
आता २०१९ वर्षही संपत आलं होतं. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण होत होती तशी चिंताही वाढत होती. माझ्या मेव्हणीने रेश्माला एका डॉक्चरांचा पत्ता दिला. ते वजन कमी करण्याची ट्रिटमेंट सांगतात असे सांगितले. त्यांच्या उपचाराचा सकात्मक फायदा माझ्या मेव्हणीला झाला होता. तेव्हा रेश्माने त्या डॉक्टरकडे जाण्याचा हट्ट धरला. बायकोचा हट्ट मग तिकडेही जायचं ठरलं. ते डॉक्टर मिरारोडला राहात होते आणि आम्ही बदलापूरला..
सुटीचा एक दिवस काढून सकाळी लवकरच आम्ही मिरारोडला जायला निघालो. त्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी काही चुर्ण, काही गोळ्या आणि काही पथ्य करण्यास माझ्या पत्नीला सांगितले. त्यानंतर रेश्मासुद्धा त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे डाएट फॉलो करायला लागली. तिने एका महिन्यात ६ किलो वजन कमी केले.त्यानंतर ते पथ्य पाळणं तिलाही जड जायला लागले. तिने पथ्य पाळणे सोडून दिले मात्र वजन कमी करायचा तिचा प्रयत्न सुरू होता. तोपर्यंत २०२० लागला होता. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण झाली होती. मी आता ठरवले होते की आपण एकदा का होईना आपण IVF चा पर्याय निवडायचा. भविष्यात असं नको वाटायला की, आपण हा पर्याय वापरला असता तर यश मिळाले असते.. त्यामुळे मी रेश्माच्या मनाचीही तयारी करायला लावत होतो. मात्र हा मार्चमध्ये कोरोना आला आणि सर्वकाही फिसकटलं. लॉकडाऊनमध्ये तर मी वर्क फ्रॉम होम करत होतो. त्यामुळे आम्ही दोघेही घरीच बसून होतो. खायचं, काम करायचं आणि झोपायचं हेच काम सुरू होतं. त्यामुळे वजन वाढणं सहाजिकच होतं. मार्च -एप्रिल असाच गेला. मात्र एप्रिलच्या शेवटी मला औरंगाबादला काही बातम्यांसाठी जावं लागलं तेव्हा आम्ही दोघे तिकडे गेेलो. दोन महिने माझ्या भावाच्या मुला-मुलींसोबत रेश्माने आणि मी खुप वेळ घालवला. कुटुंबासमवेत वेळ घालवला. वर्क फ्रॉम होम तिथेही सुरूच होतं. मात्र आमचा विकेंड धमाल असायचा. जुलैच्या सुरूवातीला आम्ही परत मुंबईत आलो. तितक्यात आईचा मला फोन आला की, इकडे खुल्दाबाद येथे एक बाबा आहे त्याचा अनेकांना गुण आलाय. तुम्ही परत या आणि आपण त्या बाबाला जाऊन भेटूयात.. तेव्हा मी तिला रागावलो.. हे बूवाबाजी मला पसंद नाही. मी नाही येणार.. तिनेही रागात फोन ठेवला.. दिवस असेच गेले.
जसा ऑगस्ट महिना लागला तसं तसं वाटायला लागलं की, या महिन्यात आपली इच्छा पुर्ण होणार.. मी याबद्दल रेश्मालाही वेळोवेळी सांगत होतो की, मला असं वाटतंय की हा महिना आपल्यासाठी सकारात्मक असेल आणि शेवटी तसंच झालं. २४ ऑगस्टलला रेश्माने मला प्रेग्नसी किट आणायला सांगितलं. मात्र तिने जेव्हा चेक केलं तेव्हा त्यावर कसल्याल रेषा आल्या नव्हत्या. आम्हा दोघांना टेन्शन आलं. ती जेव्हा ते कीट डस्टबीनमध्ये टाकायला निघाली, तेव्हा मी तिला थांबवलं आणि ते कीट तसंच ठेवायला सांगितलं. तो दिवस निराशेचाच होता आमच्यासाठी. दुसऱ्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मी लवकर उठलो आणि अंघोळीसाठी गेलो तेव्हा त्या किटवर अगदी फिकट अशा दोन रेषा उमटल्याचं दिसलं. मी जोरात रेश्मा असा तिला आवाज दिला. तिनेही जेव्हा ते कीट पाहिलं तर तिलासुद्धा आनंद झाला. पण मग मी त्या प्रेग्नंसी किटवरील सुचना वाचल्या तेव्हा तिथे स्पष्ट लिहिले होते की, "सिर्फ पाच मिनट के अंदर परिणाम देखे और किट को नष्ट करें.." तेव्हा मनाची धाकधूक अजूनच वाढली. दोघांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे जाणवत होतं. मग ठरवलं की पुन्हा एकदा किट आणून चेक करायचं. मी सकाळीच मेडिकलमध्ये गेलो. पण एवढ्या सकाळी मेडिकल कुठे उघडे असतात.. तेव्हा मेडिकलच्या शोधात पुढे पुढे जात होतो. तेव्हा एक मेडिकल नुकतंच उघडलं होतं. त्याच्याकडून ते किट घेतलं आणि घरी आलो. रेश्माला पुन्हा चेक करायला सांगितलं आणि अखेर त्या किटवर दोन्ही रेषा स्पष्ट उमटल्या होत्या... तेव्हा जो आम्हाला आनंद झाला तो शब्दात न मांडता येण्यासारखा आहे.
Wednesday, July 15, 2015
भव्य सेट असलेला अर्धवट 'बाहुबली' (दिव्य मराठी ब्लॉग)
अभिनय उत्कृष्ट, ग्राफीक्स उत्कृष्ट, वेशभुषा उत्कृष्ट, चित्रिकरण उत्कृष्ट, प्रमोशन उत्कृष्ट, मात्र कथानक... कमी दर्जाचे..
'बाहुबली' हा चित्रपट एकाच भागात संपायला हवा होता आणि जर दोन भाग करायचेच होते तर, पहिल्या भागाच्या शेवटावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अधिक विचार करायला हवा होता. सध्याचा चित्रपट एखाद्या डेलीसोप सिरियल प्रमाणेच भासतो... म्हणजे प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला न्यायची आणि मध्येच To be Continue! असे सांगायचे. त्यासाठी प्रेक्षकांना मग दुसर्या दिवशी अथवा दुसर्या आठवड्यात ती सिरियल पाहायला भाग पाडायचे. मात्र एक दिवस अथवा एक आठवडा भारतीय प्रेक्षकांना अंगवळणी पडलंय. मात्र तब्बल १ वर्ष थांबायचे म्हणजे जरा जास्तच होतं.
हॅरी पॉटर या चित्रपटाचे ८ भाग निघाले. मात्र प्रेक्षक सिनेमागृहातून कधीच असंतुष्ट होऊन बाहेर पडला नाही. त्यांनी प्रत्येक चित्रपटाचा शेवट अगदी योग्य पध्दतीने आखला होता. विशेष म्हणजे एकाच कादंबरीचे आठ भाग असूनसुध्दा कोणताच भाग प्रेक्षकांना अर्धवट वाटत नाही. मात्र बाहूबली हा काल्पनिक कथेवर आधारित चित्रपट असूनही तो प्रेक्षकांना निराश करतो.
मुळात ही निराशाही दिग्दर्शकांनीच केलेली आहे. कारण चित्रपटाचे प्रमोशन, त्यासंदर्भातील बातम्या, भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट, सर्वात मोठा सेट अशा अनेक बाबी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवून दिग्दर्शकांनी या चित्रपटाची प्रचंड उत्सूकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. मात्र ही प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून धरण्यास दिग्दर्शक कुठेतरी कमी पडले आहेत. अथवा त्यांचा अंदाज चुकला आहे. त्यामुळेच अनेकांनी चित्रपटाला केवळ ३.५ स्टार दिले आहे.
एक गोष्ट मात्र खरी आहे, ज्यांनी हिंदीतील 'मुघल-ए-आझम', 'जोधा अकबर', टॉलिवूडचा 'मगधिरा', हॉलिवूडचा 'ट्रॉय', 'ग्लॅडिएटर' आणि '३००' हे चित्रपट पाहिले नाहीत त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. पण त्यांचीसुध्दा या चित्रपटाची पटकथा निराशा करेल. मात्र ज्यांनी हे इतर चित्रपट पाहिले आहेत. त्यांची मात्र घोर निराशाच होईल हे मात्र नक्की!
Monday, April 27, 2015
BLOG: 'सल मनातली' - खरंच आपण बाबांसोबत असं वागायला नको होतं!
माझे लग्न ठरले. होणाऱ्या पत्नीला मी एक चांगला स्मार्टफोन गिफ्ट केला. व्हॉट्सअप, फेसबुक यावर ती चांगलीच अॅक्टीव्ह झाली. मात्र माझ्याकडे साधा मोबाईल असल्याने ती नाराजही होती. तीला माझ्याशी चॅटींग करता येत नव्हते. अनेक वेळा तीने इच्छा बोलून दाखवल्यावर मीसुध्दा नवीन मोबाईल घेतला. या दरम्यान माझ्या मोठ्या भावाने वडीलांना एक MP3 किपॅडचा मायक्रोमॅक्सचा मोबाईल घेऊन दिला. त्यावर ते नेहमी गाणे ऐकत असायचे. त्यांना तो मोबाईलही खुप आवडला होता. ते नेहमी गाणे लावून सकाळी फिरायला जात. मात्र अनेक दिवस आवडीने वापरल्यानंतर त्यांच्याही मोबाईलला प्रॉब्लेम येऊ लागला. त्यांच्या मोबाईलवर कॉलच येत नव्हता. त्यामुळे त्यांची फार घालमेल होत होती. त्यांना दुसरा मोबाईल दिला आम्ही वापरायला मात्र त्यांना त्यांच्या जुन्या मोबाईलशिवाय करमत नव्हते. हीच त्यांची घालमेलपाहून आम्ही त्यांना नवा XIAOMI RED MI 2 हा नवा स्मार्टफोन गिफ्ट केला. तो त्यांना खुप आवडला. तोपर्यंत माझे लग्न झाले होते. त्यामुळे आमच्या घरात सर्वांकडेच स्मार्टफोन होते. केवळ आई आणि बाबाच बाकी होते. त्यातही बाबांना मोबाईल घेतल्यामुळे ती कमीसुध्दा पुर्ण झाली, तर आईला असला मोबाईल आवडत नव्हता. नवीन मोबाईल आल्यामुळे बाबा चांगलेच खुष होते. तरीही त्यांना त्यांचा जुना मोबाईल ठिक व्हावा अशी इच्छा होती. त्यांनी मला ती अनेकदा बोलूनही दाखवली. मात्र माझ्या आळशीपणामुळे मी त्यांना नेहमी टाळाटाळ करत राहिलो. शेवटी त्यांनीच त्यांच्या एका मित्राच्या मुलाच्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात तो मोबाईल दाखवला. तेथे त्यांना कळाले की, याच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे. ते मोबाईल माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितले तु जिथे मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तेथे माझासुध्दा मोबाईल रिपेअरींगला टाक. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. अनेक वेळा पाठीमागे लागल्यानंतर मी त्यांचा मोबाईल रिपेअरिंगला टाकला. बाबांना आल्यावर सांगितले की, मोबाईल रिपेअरिंगला टाकला आहे आणि त्याला 150 रुपये खर्च येईल. बाबा म्हणाले, फक्त दिडशे रुपये, चांगले आहे. कधी देणार आहे तो मोबाईल असे त्यांनी विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
माझ्या कामाच्या गडबडीत मला तो मोबाईल आणायचे लक्षातच राहिले नाही. दोन दिवस झाले तो मोबाईल काही ना काही अडचणींमुळे आणायचे राहिलेच. या दरम्यान एका दिवशी मी ऑफिसमध्ये असताना आईचा फोन आला.
ती म्हणाली, "तुझा जुना मोबाईल जो बंद पडला होता, तो बाबांनी 200 रुपयांना भंगारवाल्याला विकला."
हे ऐकताच मला मोठा धक्का बसला. मला फार वाईट वाटले. मला काय बोलावे कळत नव्हते. मी आईला ओरडलो. मात्र फार उशीर झाला.
भावाने आईकडून फोन घेत सांगितले की, "जाऊ दे आता कोणावर ओरडू नकोस. विषय सोडून दे."
मी फोन ठेवला.
पुन्हा ऑफिसात कामाला लागलो. मात्र, कामात मन लागत नव्हतं. राहून राहून तोच विषय मनात खदखदत होता. ऑफिसमधून घरी गेलो. वडीलांशी जास्त बोललोच नाही. कारण मला माहिती होते, मी जर बोललो तर काही तरी उलटे सुलटे बोलून बसेन. म्हणून मी शांतच होतो. रात्री जेवलो आणि झोपलो. मात्र झोप लागत नव्हती. सारखा सारखा तोच विषय मनात खदखदत होता. कशी तरी झोप लागली. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. तितक्यात बाबा म्हणाले, "अरे तो मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तो कधी आणणार!"
तितक्यात आई म्हणाली, अहो त्याचा मोबाईल विकल्याने तो अपसेट झाला आहे.
हे ऐकताच माझा बांध तुटला आणि मी बडबडायला लागलो. बाबांना रागाच्या भरात काही वाही बोललो. तुम्हाला कळतयं की नाही. "तो मोबाईल नाही, तर माझी आठवण आहे." असे नाही नाही ते बरेच बोललो आणि ऑफिसला निघून गेलो.
ऑफिसला जाताना मनाला प्रश्न विचारले की, आपण आज जे काही केले ते बरोबर होते का?
उत्तर 'नाही' असे मिळाले . आपण चुकीचेच वागलो आहे हे पटायला लागले.
तेव्हा एकदम आठवले की, लहानपणी बाबांनी अत्यंत आवडीने अनेक वस्तू घरात आणल्या होत्या. त्यापैकी अनेक वस्तू आम्ही तोडल्या होत्या, काही हरवल्या होत्या. त्यावेळी त्यांना राग आलाही असेल, मात्र ते आमच्या हातून घडले असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले होते. त्यांनी अत्यंत आवडीने आणलेली लोलक असलेल्या घड्याळीची काच मी आणि माझ्या भावाने घरात बॉल खेळताना फोडली होती. त्यावेळी आम्ही फार घाबरलो होतो. बाबा नोकरीवरून घरी आले. त्यांनी ते पाहिले मात्र ते आम्हाला काहीच म्हणाले नाही. त्यांनी त्या काचेच्या ठिकाणी एक मेनकापड (प्लास्टीक) लावले आणि पुन्हा ती घड्याळ सुरू केली. अशा अनेक आठवणी मनात तरळू लागल्या. मन गहिवरून आले. हे सर्व मनात सुरू असताना ऑफिस कधी आले कळालेच नाही.
ऑफिसला गेलो. काम करण्यास सुरूवात केली. तितक्यात आईचा फोन आला.
ती म्हणाली "बाबा सकाळीच त्या भंगारवाल्याला शोधायला गेलेत. काहीच खाल्लं नाही त्यांनी. तु बाहेर पडलास, त्यानंतर ते लगेच बाहेर पडले. त्यांना त्या भंगारवाल्याचे दुकानही कोठे आहे माहित नाही."
मला काय बोलावे ते कळतच नव्हते. मी फोन ठेवला आणि तसाच कामाला लागलो. राहुन राहुन मनाला फार खात होतो. सारखे साऱखे आपल्या चुकीची जाणीव होत होती. पण आता फार उशीर झाला होता. त्यानंतर दुपारी आईचा पुन्हा फोन आला.
ती म्हणाली "बाबांनी त्या भंगारवाल्याकडून तो मोबाईल परत आणला."
मी म्हणालो कसं काय? मग ती सांगायला लागली.
"तु ऑफिसला गेल्यावर बाबा सकाळीच घराबाहेर पडले. नाश्ताही केला नाही. तसेच उन्हात गेले. नतंर दुपारी घरी आले. मी विचारलं त्यांना कुठे गेला होतात. तेव्हा म्हणाले त्या भंगार वाल्याला शोधायला गेलो होतो. त्यानंतर मी त्यांना त्याच्या दुकानाचा पत्ता सांगितला. तेव्हा ते लगेचच त्या दुकानाकडे गेले. तिथेच उन्हात दीड दोन तास वाट पाहिल्यानंतर तो भंगारवाला आला आणि त्यांनी विनंती करून मोबाईल परत आणला."
आई बोलत होती, मात्र मला काय बोलावे ते कळतच नव्हते. खुप वाईट वाटले आणि फोन मिळाल्याच्या आनंदपेक्षा बाबांना बोलल्याचे दुःख मनात जास्त सलत होते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाताना बाबांचा रिपेअरींगला टाकलेला मोबाईल घेतला आणि घरी गेलो. बाबांना त्यांचा मोबाईल दिला. त्यांना तो मोबाईल सुरू झाल्याचे पाहून आनंद झाला, पण मला आतून फार वाईट वाटत होते. थोड्या वेळाने आईने मला माझा मोबाईल परत केला.
ती म्हणाली हाच, "आहे ना तो... नीट बघून घे."
मला तर काहीच बोलावेसे वाटत नव्हते. मी तो मोबाईल घेतला आणि माझ्या कपाटात ठेवला.
त्या दिवशी मनाला प्रश्न पडला. आपण खरंच असं का वागलो?
बाबांनी तो मोबाईल कदाचित त्यांच्या मोबाईलला लागणारे 150 रुपये घरातील पडीक सामानातून जमवण्याचा तर प्रयत्न केला नसेल.
त्यांना आपण बोलल्यावर काय वाटले असेल?
त्यांच्या मनात असा विचार आला असेल का?, की याच मुलानी माझ्या कित्येक आवडीच्या गोष्टी तोडल्या, फोडल्या तेव्हा मी काहीही म्हणालो नाही, मात्र आता याची एक बंद पडलेली गोष्ट विकली तर तो किती बोलतोय?
अथवा ते मनातल्या मनात स्वतःला खात होते, की आपण तो मोबाईल विकायला नको होता..
अशा एक ना शंभर प्रश्नांनी मनात गर्दी केली.





