Friday, July 8, 2011

एक ई-मेल (07 July 2011)

एक ई-मेल
आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग जवळ आल्याचे म्हटले जाते. परंतु यामूळे माणूस माणसाच्या दूर जात असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. कारण आज मोबाईल, इंटरनेट या गोष्टींमूळे आपण आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांशी तसेच मित्र मैत्रीणीशी क्षणभरात बोलू शकतो, संदेश पाठवू शकतो तसेच आपल्या भावना विविध मार्गाने व्यक्त करु शकतो आणि हे सहज शक्य होत असल्यामूळे व्यक्तीच्या मनातून इतरांशी जाऊऩ भेटावे अशी भावना संपत चालली आहे. कारण अप्रत्यक्षरित्या आपल्या आवडीची व्यक्ती ही आपल्या जवळच आहे असा भास हे तंत्रज्ञान निर्माण करत आहे आणि आजची व्यक्ती याच भासाला सत्य मानून चालत आहे. परंतु सत्य तर हेच आहे ना की आपल्या जवळची व्यक्ती ही आपल्या जवळ नसून ती दूर कुठेतरी आहे.
असो मी आज काही या आधुनिक तंत्रज्ञान फायद्याचे आहे की तोट्याचे या विषयावर नाही बोलणार कारण आजचा विषयच मुळी वेगळा आहे. माझ्या आयुष्यात सर्वात जास्त मित्र मैत्रीण हे कॉलेजच्या दिवसांत झाले. परंतु जसे कॉलेज संपले तशी नवीन मित्र मैत्रीण व्हायचे सुध्दा थांबले. कॉलेज जीवन संपताच माझ्या हाती इंटरनेट सारखे एक माध्यम आले की, ज्यामुळे मी माझ्या जुन्या सर्व मित्रांच्या कायम संपर्कात राहू शकेल. इंटरनेटवर असलेल्या ईमेल तसेच फ्री मोबाईल मेसेज सेवांमुळे मी प्रत्येकाच्या संपर्कात राहायला लागलो. आज माझ्याकडे शाळेपासून ते पोस्ट ग्रॅज्यूएशन पर्यंतच्या अनेक मित्रांचे नंबर आहेत आणि त्यांना मी मोबाईल मेसेजच्या माध्यमातून भेटत असतो. त्यानंतर माझ्या हाती सोशल नेटवर्कींग सारखे माध्यम आल्याने मी नवीन मित्र मैत्रीणी तर करु शकतच होतो तसेच जूने, जवळचे मित्र जे की शाळेनंतर दूर गेले होते त्यांना सुध्दा शोधणे शक्य झाले होते. सोशल नेटवर्कींगने मला अनेक मित्रांच्या पुन्हा जवळ नेले. त्याबाबत मी सोशल नेटवर्कींगचा ऋणी आहे.
मी माझ्या कामाची तसेच कथा-कवीतांची ईमेलस् माझ्या ईमेल बॉक्समध्ये जेवढे ईमेल आयडी असतील त्या सर्वांना पाठवतो. त्या निमित्ताने मी त्या सर्वांच्या इनबॉक्स मध्ये तरी पोहचू शकतो ही माझी आयडीया. एकदा असेच मी माझ्या कॉमिक्सच्या कामाचे ईमेल परिचीत अपरिचीत सर्व ईमेल आडयीवर पाठवले आणि काही दिवसांत मला एक ईमेल आला की, 'तू राहूल रणसुभे म्हणजे कोण? तुमची कास्ट कोणती?' हा ईमेल होता एका मुलीचा. मग मी तीला रिप्लाय दिला की, मी औरंगाबादला राहतो आणि मी भावसारच आहे. तुम्ही कोण आहात?.. मग दोन – तीन दिवसांनी तीचा पुन्हा रिप्लाय आला की, 'हो मी सुध्दा भावसारच आहे'.. एवढं बोलून बोलणं थांबलं काही दिवस. मग मी काही प्रश्न विचारली आणि तीने रिप्लाय दिला, मग तिने काही प्रश्न विचारली आणि मी रिप्लाय दिला, असे अनेक वेळेस चालायचे. एक दिवस ह्या ईमेलच्या देवाण-घेवाणीला कंटाळून मी तीला मोबाईल नंबर मागितला व माझा सुध्दा नंबर तिला दिला. सुरुवातीला मोबाईल नंबर बाबत मला नकार आला नंतर मग मिळाला. कधी मेसेज कधी फोन असे होत होते. परंतु ते ही महिन्या-दोन महिन्यातून एकदा. हळूहळू ते ही बंद पडलं. मी तीला पाहिले नव्हते परंतु तीने मला पाहिले होते. कारण मी तिला माझ्या कामाचे फोटो पाठवले होते. आता मला तीला पहायचे होते. मी तशी तिच्या जवळ विचारणा केली परंतु तीने फोटो पाठवण्यास नकार दिला. पण नंतर काही दिवसांनी तीने फोटो सुध्दा पाठवला. छान होती दिसायला. मग मी तीला आपण भेटायचे का? असे विचारले. तेव्हा तिला मला भेटण्यास जास्त उत्सूकता नव्हती. परंतु माझा एक नियम आहे की, मैत्री करायची तर भेटलेच पाहिजे. कारण या मोबाईल आणि चॅटींगवर माझा विश्वास नाही. लोक सर्रास खोट बोलतात याच्यावर! परंतु समोरा-समोर बोलताना ते शक्य नसते. जरी कोणी खोटं बोललं तर लगेच कळते. ती भेटायला तयारच नव्हती. मी सांगितले की, मी तूझ्या गावाला येतच असतो तेव्हा भेटू कारण माझ्या नातेवाईकांचे गाव व तिचे गाव एकच आहे. ती हो चालेल असे तर म्हणाली परंतु त्यानंतर माझे त्या नातेवाईकांकडे कधीच जाणे झाले नाही. मग मी तिला औरंगाबादला येण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला. तिला नाही जमणार असे सांगितले. ती म्हणाली माझे पुण्यात नेहमी येणे जाणे असते जमलस तर तिथेच भेटू परंतु मी औरंगाबादला होतो आणि माझे पुण्यात काहीच काम नसायचे. मग काय सर्व कार्यक्रम बारगळला. हे असे 2 वर्ष चालले. नंतर 6 महीने तीचा फोन नाही की माझा फोन नाही. कधी तरी एखाद तीन महिन्याने तीचा एसएमएस यायचा आणि मी ही कधी तरी रिप्लाय द्यायचो तिच्या मेसेजला. मी तर अपेक्षाच सोडली होती तिला भेटायची.
नंतर काय मला पुण्यात नोकरी लागली आणि मी इथे आलो. एक दिवस असाच तिचा मेसेज आला की, 'काय करत आहेस?'.. मी रिप्लाय दिला, 'मी सध्या पुण्यात आहे. मला पुण्यात नोकरी लागली आहे इथे.' तीने अभिनंदन केले. मी तिला भेटण्याचा विचारचं सोडल्यामुळे मला पुन्हा तिला विचारायचे धाडस नव्हते. परंतु नंतर तिने मला तिच्या ऑफिसच्या कामासाठी मी पुण्यात येणार आहे असे सांगितले तेव्हा मी सहजच विचारले की, आपण भेटायचे का? तर तिने होकार दिला आणि भेटण्याची तारीख व वेळ ठरली. मला तर धक्काच बसला. मला वाटलं सुध्दा नव्हते की, ती इतक्या सहज होकार देईल म्हणून. परंतु तीचा होकार मिळाला होता. मग काय त्या दिवसाची वाट पहायची होती आणि तो दिवस आज उजडला. दूपारी 12.30 वाजता तीला भेटायला स्टेशनवर जायचे होते. मी 10 वाजताच बसच्या प्रतिक्षेत वाड्याजवळच्या बस स्टॉपवर वाट पाहत होतो. परंतु जेव्हा गडबड असते तेव्हा सर्व गोष्टी अडून पाहतात आणि नेमका तेव्हाच उशीर होतो. आजही तसेच झाले. बस काही येत नव्हती. मी अभिषेकला फोन केला. तो इथे एक वर्षापासून राहत असल्यामूळे त्याला इथलच्या बस व रस्ते सर्व माहीत आहे. मग त्याने मला एक बसस्टॉप सांगितला की जेथून स्टेशनला 5-5 मिनिटाला बस आहेत. मग मी धावत पळत त्या बसस्टॉप वर पोहचलो तर तेथून एक स्टेशनची बस नूकतीच सुटली होती. मी पळत पळत त्या बसला गाठले आणि बसमध्ये चढलो. परंतु हे माझ्या कोणत्या जन्मीचे पाप होते की, ती बस सुध्दा अशी गल्ल्याबोळातून जात होती की बस्स.. मला तर वैतागच आला होता. एक तर बस 11.30 भेटली आणि त्यातल्या त्यात पुण्याचे ट्रॅफीक. तिचा मेसेज आला की, मी स्टेशनवर येऊन पोहचली आहे आणि तूझी वाट पाहत आहे. मला कोणाला माझी वाट पाहण्यास लावायला मुळीच आवडत नाही आणि त्यातल्या त्यात आमची ही पहिली भेट, त्यात मी उशीरा जायचे, हे माझ्यासाठी फारच लाजिरवाण्या सारखे होते. परंतु काय करणार शेवटी दगडाखाली बोट होते माझे. बस शिवाय मी पोहचू शकत नव्हतो आणि बस मला वेळेवर पोहचवणार नव्हती. कशी-बशी गल्लीतली कुत्री, गटारं, झोपडपट्टी दाखवत दाखवत बसने मला स्टेशन जवळच्या बसस्टॉपवर सोडले. बसस्टॉप पासून स्टेशनचे अंतर 5 मि. होते. तेवढ्यात तिचा मेसेज आला की, 'मी निळा ड्रेस घातला आहे. तू लवकर ये. किती वेळ लागले तूला.' मी रिप्लाय दिला की, 'बस 5 मि. पोहचतोय.'
मी पळत पळत स्टेशवर गेलो. इकडे तिकडे तिला शोधू लागलो. ती इन्क्वायरी ऑफिसजवळ बसलेली आहे असे तीने मेसेज मध्ये सांगितले होते. मी मेन गेटने आत गेलो तर मला इन्क्वायरी ऑफिसच सापडत नव्हते. एक दोन जणांना विचारल्यावर मला त्यांनी तिथे जाण्याचा रस्ता सांगितला. मी गडबडीत तिथे गेलो. त्या ऑफिसात प्रवेश करताच तेथील बाकावर बघायला लागलो. त्या बाकावर सर्वत्र मुले आणि म्हतारे लोकच होती. एकाद दूसरी बाई दिसायची. मग एकदम नजर गेली ती एका आकाशी रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीवर. तीच होती ती. तीने मला ओळखलं आणि मी तीला. आज पहिल्यांदा मी तिला समक्ष पाहिलं होतं आणि तिने मला.
आमच्या ईमेलला सुरुवात होऊन आज तीन वर्ष झाली होती. आज किमान 3 वर्षानंतर तरी आमची भेट झाली असल्याने मी तर खूष होतोच आणि ती सुध्दा खूष असावी. आम्ही एक-दीड तास तेथे होतो. बऱ्याच गोष्टी शेअर केल्या, गप्पा मारल्या आमच्या दोघांच्या कामाविषयी जाणून घेतले. माझ्या ऑफिसची वेळ होत होती म्हणून मी तेथून निघालो. तिला सुध्दा काही तरी काम होते म्हणून ती सुध्दा निघण्याच्याच तयारीत होती. आम्ही दोघांनी मग तीन वर्षानंतरच्या भेटीचा निरोप घेतला. एका ईमेलने सुरु झालेली मैत्रीचे आज भेटीत रुपांतर झाले होते आणि या भेटीनंतर पुन्हा अनेक ईमेलचा प्रवास सुरु होणार होता...

1 comment: