Sunday, June 26, 2011

पालखी... भेट (25 June 2011)

पालखी... भेट
काल माझे आईवडील आले होते. तेच ई.एस.आय.सी. चे काम करायला. त्यांना स्वारगेटवर भेटलो आणि तेथून लगेचच ई.एस.आय.सी. च्या ऑफिसमध्ये गेलो. फोटो, फिंगर प्रिन्ट्स सर्व गोष्टी झाल्यावर तेथून लगेचच निघालो. वडीलांना भूक लागली म्हणून चांगल्या हॉटेलमध्ये जेऊ घालावे म्हणून तिथेच असलेल्या एका हॉटेल मध्ये घेऊन गेलो. जेवायला मागीतले वेटरला तर तो म्हणाला इतक्या सकाळी आम्ही जेवण नाही बनवत. मला खूप वाईट वाटले परंतु काय करणार मग नाश्तासाठी मागवले. तोपर्यंत आईने घरुन माझ्यासाठी बनवून आणलेले शंकरपाळी, चिवडा तसेच सागरच्या आईने त्याच्यासाठीसुध्दा चिवडा, बिस्कीट असे खाण्यासाठी पाठवले होते. खरंच आईची माया कशी असते पहा मी आईला काहीतरी खाण्यासाठी आण असे सांगणार होतो परंतु पुन्हा आईला त्रास होईल म्हणून मी काहीच नाही सांगितले. परंतु आईने आठवणीने माझ्या मनासारखं घेऊन आली होती. नाश्ता करुन आम्ही शाहूमहाराज बस्टॅंडवर गेलो आणि तेथे आईवडीलांना पुन्हा आळंदीच्या गाडीत बसवून मी घरी आलो.
आज आईवडील ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पुण्यात येणार होते. सकाळीच त्यांचा फोन आला होता. संध्याकाळपर्यंत ते पुण्यात येणार होते. माझे ऑफिस टाईम आज संध्याकाळी ४ ते रात्री ११ असा होता. म्हणून आज आरामशीर उठलो माझा रुममेट विवेक त्याला सुध्दा आज चौथ्या शनिवारची सुट्टी असल्याने तो सुध्दा घरीच होता. तो आणि मी फिरायला निघालो. फिरायला म्हणजे त्याला काही पुस्तकं पहायची होती आणि पुस्तकांचे मुख्य मार्केट माझ्या ऑफिसजवळचं असल्याने आम्ही तिकडेच निघालो. परंतु आज पालखी येणार असल्यामुळे तेथील सर्व दूकाने हटवीली होती. माझे ऑफिस आणि पालखी येण्याचे ठिकाण हे एकच असल्याने तेथे आज गर्दीचा महासागर लोटणार होता. तशी दूपार पासूनच गर्दीची चाहूल लागायला लागली होती. आम्ही दगडूशेठ गणपती चौकात गेलो. एक एक दिंडी तेथून येतच होती. संपूर्ण रस्ता हा वारकऱ्यांनी भरला होता. आम्ही बराच वेळ त्या दिंड्याना पाहत बसलो होतो. नंतर माझ्या ऑफिसचा टाईम झाला आणि मी ऑफिसकडे निघालो. मित्र घराकडे निघाला. ऑफिसमध्ये सुध्दा आज सर्वत्र पालखीचाच विषय होता. मला कॅमेरा नसल्याची खुप खंत होत होती. मला एक तर फोटोग्राफीचा खुप नाद आणि त्यात पंढरपूरची वारी. अशी सुवर्ण संधी हातातून जात असल्याची खंत मनाला खुप हूरहूर लावत होती. जाऊदे पुढच्या वारीपर्यंत मी कॅमेऱ्याची सोय करुन घेईल. संध्याकाळी वडीलांचा फोन आला. त्यांनी मला जेवायला बोलावले. मी आणि प्रशांत काम आवरुन लगेच माझ्या आईवडीलांकडे गेलो. रविवार पेठ मध्ये त्यांची दिंडी विश्राम करायला थांबली होती. वडीला बाहेर असलेल्या कमला नेहरू विद्यालय जवळ माझी वाट पाहत थांबले होते. आम्ही जाऊन त्यांना भेटलो. आई चालून खूप दमली होती. पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता जणू तिचे पाय दूखणे थांबलेच होते. आई सोबत बोललो बराच वेळ. प्रशांतची आईवडीलांना ओळख करुन दिली. मुख्य दिंडी न आल्याने अजून जेवणाच्या पंगती बसल्या नव्हत्या. आम्ही बराच वेळ वाट पाहिली नंतर निघून गेलो. मी न जेवता जाताना पाहून आईच्या जीवाची होणारी तळमळ मला जाणवत होती परंतु मी ड्यूटी टाईमवर असल्याने तसेच खूप कामसुध्दा बाकी असल्याने मला जाणे गरजेचे होते. एका हॉटेल वर जेवण करुन मी ऑफिसात गेलो.
रात्री १२ पर्यंत सर्व काम आवरलं. १२ वाजता सागर आणि विवेक माझ्याकडे येणार होते आणि तेथून आम्ही ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो. १२ वाजता ते आले आणि आम्ही पालखीच्या शोधात निघालो. रात्री १.०० वाजेला भवानीपेठेत पोहचलो. तेथे खूप मोठी रांग होती. दर्शन होई पर्यंत २.०० वाजले. तेथून आमचे घर जवळपास ५ - ६ किमी. चांगलीच वाट लागणार होती. आणि आमच्या घराचा रस्ता बुधवार पेठ मधून जाणार असल्यामुळे पोलीसांची चांगलीच रेलचेल होती. बुधवार पेठ म्हणजे प्रोस्टेट्यूट एरीआ (रेडलाईट एरीआ). परंतु माझ्याकडे पत्रकाराचे कार्ड असल्यामुळे आम्हाला तेवढी भीती वाटत नव्हती. कसे बसे पाय तोडत घराकडे आलो. रात्रीचे ३.०० वाजले होते घरी पोहचे पर्यंत. घरी पोहचलो आणि कधी झोपतो कधी नाही असे झाले होते. पटकन अंथरुण टाकून झोपलो.

No comments:

Post a Comment