Sunday, June 26, 2011

फेसबूक (24 June 2011)

फेसबूक

आज प्रत्येक शहरातील तरुण तरुणींचा एकत्र येऊन गप्पा-टप्पा, मस्ती – मजा करण्याचे ठिकाण म्हणजे "फेसबूक”. प्रत्येकजण आपल्या मित्रांना इथे काही ना काही सांगत असतो. फोटोज, व्हिडीओ, पोस्ट असे काही ना काही शेअर करण्यासाठी उतावळा असतो. आज जवळपास ५० करोड युजर्स फेसबुककडे आहेत. त्यामुळे फेसबुक आता जगातील पहिल्या क्रमांकाची सोशल नेटवर्कींग साईट झाली आहे.
आपल्या आवडललेल्या विषयाला लाईक करणे, आवता फोटो, अल्बम टॅग करणे, चॅटींग, पोक, मित्रांच्या वॉलवर त्यांना जोक शेअर करणे, आपल्या वॉलवरील प्रोफाईल फोटो चांगला दिसण्यासाठी चांगला फोटो काढून घेण्याची धडपड असे आज बहूतेक तरुण-तरुणींचा दिनक्रम झालाय. फेसबुकमुळे प्रत्येकाला स्वतचे मत मांडायला एक दालन खुल झाल्यामुळे इथे लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत सगळेच दिसतात. आपल्या लेखांना, कवितांना आपल्या वॉलवर पोस्ट करुन आपल्या मित्रांकडून आलेल्या कमेंटस् ना रिप्लाय देणे, लाईक करणे हा एक वेगळा अनुभव प्रत्येक फेसबुक युजरसाठी झालाय. त्यामुळे २१ व्या शतकातला कॉलेज कट्टा म्हणा अथवा गावातील पार म्हणा, गल्लीतल्या गप्पा म्हणा अथवा चौकातली चर्चा म्हणा फेसबुक या सर्वांवरील उत्तर असल्या सारखे आहे.
मी औरंगाबादला असताना माझे दिवसातले जवळपास ५ ते ६ तास हे फेसबुकवर जायचे. मी चार-पाच कम्यूनीटीज बनवल्या आहेत, त्यातच पोस्ट करत करत तसेच मित्रांशी चॅटींग करत, नवीन मुला-मुलींना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत माझा दिवस जात होता. पण इथे पुण्यात इंटरनेट आहे, फेसबुक आहे परंतु वापरायला वेळ नाही. तरीही दिवसातून दोन-तीन वेळा मी माझे अकाऊंट चेक करतो. फेसबुकवर मी औरंगाबादला असताना एका संदिप पाटील नावाच्या एका प्राध्यापकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती कारण ही तसच होतं की, तो खुप छान लेख लिहायचा आणि त्याला वीस-तीस कमेंट्स सुध्दा येत होत्या. त्याची फ्रेंड लिस्ट सुध्दा हजार-दिड हजारच्या घरात होती. त्यामुळे मी त्याला ऍड करायचे ठरवले होते आणि तो मला ऍड सुध्दा झाला. त्याचे लेख खरंच चांगले व दर्जेदार होते. भारतीय राजकारणावरील त्याची टिका तो खुप छान पध्दतीने मांडायचा. परंतु नंतर नंतर त्याने जातीवादावरील लेख शेअर करणे सुरु केले. ते लेख म्हणजे जुने शिवाजी राजांच्या काळातील ब्राम्हणांचे आणि तो एकदम वाईटपणे त्यासर्व घटनेचा उल्लेख करुन ब्राम्हणांविरुध्द शिवीगाळ करण्यापर्यंत त्याची मजल गेली. माझ्या एका मित्राने त्याच्या बाबत मला सांगितले नंतर मी पण स्वतहून त्यात लक्ष घातले. तर खरचं तो एकदम वाईटपध्दतीने जुन्या गोष्टींच्या आधारावर आजच्या ब्राम्हणांबाबत बोलत होता. मी त्याच्या पोस्ट खाली त्याला कमेंट्स दिल्या की, संदिप तु्म्ही शिकलेले आहात, सुज्ञ आहात तेव्हा हे जुने पुराण उकरुन तुम्हाला काय मिळणार, जर तुम्हाला सध्या कुठेतरी जातीवादाविषयीची गोष्ट अढळली असेल तर त्याचा उल्लेख करा. उगीच पुराणातली वांगी फेसबुक सारख्या चांगल्या माध्यमावर विकू नका. त्याने माझी ही कमेंट वाचली का नाही माहित नाही. परंतु पुन्हा २-३ वेळा त्याने हेच कृत्य केले. मी त्याला प्रत्येक वेळेस निषेध नोंदवला. नंतर काल त्याने हद्दच केली. तो माझ्याशी चॅटींग करायला लागला आणि चॅटींगचे रुप भांडणापर्यंत आले. तो मला शिवीगाळ करत होता, धमकी देत होता. मी त्याच्या या कृत्याला काही घाबरलो नाही उलट त्याने दिलेल्या शिव्या, धमकी मी फेसबुकवर सार्वजनिक करुन टाकली आणि त्याचे खरे रुप त्याच्या मित्रमंडळी व इतर लोकांसमोर आणले. त्याची चांगलीच बोंब झाली होती. मग त्याने लगेच मला ब्लॉक करुन टाकले. बिचारा संदीप त्याला या पहिले कोणी असं भेटलं नसावं फेसबुकवर...
असो, पण मला या लोकांचा प्रश्न पडतो. इतके शिकलेले, सुज्ञ, विचारवंत लोक असे का वागतात. डॉ. बाबासाहेबांचे एक वाक्य आहे की, शिक्षण हे वाघीणीच्या दुधाप्रमाणे आहे जो पिल तो गुरगुरेलचं. मग हे लोक हे वाघिणीचे दुध पिऊन सुध्दा असे का आहेत. अनेक जणांना तर शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हेच माहीत नसते. त्यांना वाटते शिक्षण म्हणजे बकरीचेच दुध असल्या प्रमाणे ते वागतात म्हणजे शिक्षण घेऊन त्यांच्यात काहीच बदल झालेला नसतो. मग अशा लोकांनी फक्त डिगरी घेतली असते खऱ्याज्ञानापासून तर ते कोसो दूर आहेत.

No comments:

Post a Comment