Wednesday, June 29, 2011

भेट (28 June 2011)

भेट
माझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे माझ्या एम.एस.डब्ल्यू. नंतरच. एम.एस.डब्ल्यूच्या आधी मी एका वेगळ्याच मार्गावर वावरत होतो परंतु एम.एस.डब्ल्यू. मधील काही प्रसंग, घटना, आठवणी यांनी माझ्या आयुष्याला जे वळन दिले ते खरचं महत्वाचे होते. एम.एस.डब्ल्यू. नंतर मला माझ्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती अथवा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास एम.एस.डब्ल्यू. मध्ये मला मार्ग सापडला. याच काळात मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि त्या प्रेमातून सुध्दा खूप काही शिकलो. तसे माझे एकतर्फी प्रेम होते. परंतु त्या व्यक्तीने मला या दोन वर्षात जे काही करायला भाग पाडले अथवा त्याच्यासाठी मी ज्या काही परिस्थितींना तोंड दिले त्यातून माझ्या जीवनाला एक वेगळे आणि चांगले वळण मिळाले त्यासाठी त्या व्यक्तीचा मी आयुष्यभर ऋणी आहे. या प्रेमामुळेच किंवा त्या व्यक्तीमूळे जो मी स्वतःच्या शोधात पडलो तेव्हा पासून ते आतापर्यंत मी स्वतःला खूप काही शोधले आहे. मला माझ्यातील चांगल्या तसेच वाईट गोष्टी दिसायला लागल्या. प्रत्येक मित्र, मैत्रिण तसेच इतर व्यक्ती यांच्याकडून चांगले काय घेता येईल याची सवय लागली. तसेच मनात जास्त विचार केल्यामुळे अनेक प्रश्न उभी राहत होती त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. जसे की, स्वतःतला आत्मविश्वास, दूरदृष्टीकोन, सकारात्मकता, व्यवहारीकता, वेळेचे नियोजन, (माणसे ओळखणे) मानसशास्त्र, इतरांना समजून घेणे, राग न करणे, इतर अशा खूप काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या.
याच एम.एस.डब्ल्यूच्या दोन वर्षा दरम्यान माझी अजून एक मैत्रीण झाली होती. राखी. राखी असे तिचे नाव होते. ती खूप हूशार, स्वच्छंदी तसेच कलाकार वृत्तीची असल्यामुळे तीची माझी मैत्री खुप लवकर झाली. आम्ही जास्त बोलत नसलो तरी एकमेकांना समजून घेण्यात हूशारच होतो. शेवटी एक कलाकारच कलाकाराच्या भावना समजू शकतो हे खरेच आहे. आमच्या मध्ये एक गोष्ट कॉमन अशी म्हणजे आम्हा दोघांना इंटेरिअर डेकोरेशनचा क्लास करायचा होता. परंतु आम्ही दोघं ते न करता इथे एम.एस.डब्ल्यू. ला होतो. बरं झालं त्या निमित्ताने एक चांगली मैत्रीण तरी भेटली होती. तिला सुध्दा चित्रकलेची खूप आवड होती आणि क्रीएटीव्हीटी ही माझ्यापेक्षा थोडी तिच्यात जास्त होती. तिची एक गोष्ट खूप चांगली होती ती म्हणजे कोणतीही छोटे अथवा मोठे काम ती अगदी मन लावून बारकाईने व जितके चांगले करता येईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करत असायची. माझा हाच विक पॉईंट होता की, माझ्यात पेशन्स खूप म्हणजे खूप कमी होते. मी कोणतेही काम लवकरात लवकर संपवून मोकळे व्हायचे बघत असतो. मला माझ्यातील ही कमतरता माहीत होती. त्यामुळेच तिची ही गोष्ट मला खूप आवडायची. तिच्यासोबत मी एक दोन कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने मला तिच्याकडून ह्या गोष्टी शिकता आल्या. आम्ही दोन वर्षात कुठेच फिरलो नाही, अथवा जास्त बोललो नाही. खूप आठवणीत राहतील अशी कोणतीच घटना आमच्यात घडली नाही. परंतु आम्ही चांगले मित्र-मैत्रिण होतो मी हे आवर्जून सांगेन.एम.एस.डब्ल्यू. च्या दोन वर्षानंतर ऱाखीने लग्न केले. तिचीसाठी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तीचे ज्या मुलावर प्रेम होते त्याच्याशीच तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिले. आणि आता ते दोघे पुण्यातच स्थायिक झालेत.

आज माझा पुण्यातला तेरावा दिवस आणि दूसरा मंगळवार. मला मंगळवारी सुट्टी असते असे सांगितले तर माझे सर्व मित्र माझ्यावर हासतात. अभिषेक तर म्हणतो, मी लोकांना सोमवार ची सुट्टी, शनिवार, शुक्रवार इथपर्यंत की गुरुवारची सुट्टी सुध्दा ऐकली ही मंगळवारची सुट्टी जरा अजबच आहे. असे म्हणून ते माझी खूप मजा उडवतात. मी सुध्दा त्यांच्या मजे मध्ये सहभागी होऊन त्या क्षणाचा आनंद घेतो. आज पुन्हा सुट्टी असल्यामुळे मी आदोगरच काही प्लान करुन ठेवले होते. काल जीमेल वर चॅटींग करत असताना अचानक माझी मैत्रीण राखी भेटली. तीला मी पुण्याला आलोय असा मेल केला होता परवा. आणि काल अचानक ती ऑनलाईन दिसली. चॅटींगवर बोलता बोलता उद्या सुट्टी असल्याचे तीला सांगितले. उद्या भेटायचा प्लॅन ठरला. सकाळी फोन आला की दू. १ वाजता एस.पी. कॉलेज कडे भेटायचे ठरले. मी तयार होऊन तिला भेटायला गेलो. आज पुण्यात मी पहिल्यांदा माझ्या एम.एस.डब्ल्यू. मैत्रीणीला भेटणार असल्याने मला खूप आनंद होत होता.
मी एस.पी. कॉलेजसमोर उभा होतो. तीने रस्त्याच्या दूसऱ्या बाजूने मला आवाज दिला. आम्हा दोघांना एकमेकांना पाहून पुन्हा एम.एस.डब्ल्यू. चे जूने दिवस आठवायला लागले. आम्ही दोघे मग नाश्ता करायला गेलो. तिथेच सर्व मित्र-मैत्रीणींची खुशहालीची विचारपूस करत आमचा नाश्ता झाला. अनेक जून्या आठवणी, गमतीदार किस्से, तसेच इतर गोष्टींच्या आठवणींची गर्दी विषयांमध्ये होत होती. एक एक करत सर्व गोष्टींवर चर्चा झाली. तेरा दिवसांमधला आज तिसऱ्यांदा खूप छान दिवस वाटत होता. पहिले दोन दिवस तर घरच्यांना भेटलो होतो आणि आज राखी. एकंदरीत आजची सुट्टी कामाला आली होती. नंतर एक तासानंतर ती तिच्या कामावर निघाली आणि मी माझ्या घराकडे वळालो. पुन्हा भेट होईलच या आशेने एकमेकांचा निरोप घेतला. तिने घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि ती निघून गेली.
ती गेल्यावर पुन्हा अनेक प्रश्न मनात येत होते. वाटत होतं की खरंच आमची मैत्री एवढी चांगली होती का? की, आज एवढ्या दिवसांनंतर एकमेकांना भेटल्यावर हा आनंद व्हावा. आम्ही कधीच जास्त भेटलो नाही अथवा बोललो नाही तरी सुध्दा आज या नव्या शहरामध्ये एकमेकांना भेटावे वाटले. मला स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते की, ती लग्नानंतरच्या इतर फॉरमॅलिटीतून वेळ काढून मला भेटायला येईल.
मला आज खरंच खूप चांगले सुध्दा वाटत होते आणि खरंच आपण त्या दोन वर्षात काय-काय मिळवलं आणि त्या दोन वर्षानंतर काय काय गमावलं या गोष्टीवर आज पुन्हा विचार करण्याची वेळ आली होती.

No comments:

Post a Comment